प्रा., संतोष सोमनाथ कपाळे. "हैद्राबाद मुक्तिसंग्राम लढ्यात स्वातंत्र्यसेनानी विश्वनाथ आबा कोळगे यांचे योगदान". उदयगिरी - बहुभाषिक इतिहास संशोधन पत्रिका (Udayagiri Bahubhashik Itihas Sanshodhan Patrika - A Bimonthly, Refereed, & Peer Reviewed Journal of History) 01, № 04 (2023): 94–101. https://doi.org/10.5281/zenodo.8343902.
Abstract:
<strong>हैद्राबाद मुक्तिसंग्राम लढ्यात स्वातंत्र्यसेनानी विश्वनाथ आबा कोळगे यांचे योगदान</strong> प्रा. संतोष सोमनाथ कपाळे श्री. स्वामी समर्थ कला व विज्ञान वरिष्ठ महाविद्यालय, रुईभर ता. जि. उस्मानाबाद ४१३५०१ महाराष्ट्र, भारत <em>Corresponding author E-mail</em>: santoshkapale24@gmail.com Received: 14 September, 2023 | Accepted: 15 September, 2023 | Published: 15 September, 2023 --------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------- <strong>महत्वाचे शब्द: </strong>हैद्राबाद मुक्तिसंग्राम, विश्वनाथ आबा कोळगे, मराठवाडा मुक्तिसंग्राम, रजाकार, निजाम, हैदराबाद संस्थान <strong>प्रस्तावना</strong> ब्रिटिश साम्राज्याची आधारस्तंभ असणारी जी संस्थांनी होती त्यामध्ये हैद्राबाद हे सर्वात मोठे संस्थान होते. संपत्तीच्या दृष्ट्याही हा निजाम इतर संस्थानिका पेक्षा मोठ्या दर्जाचा व सबल असा होता. भारताला स्वातंत्र्य झाल्यानंतरही स्वतःचे संस्थान स्वतंत्र ठेवण्याचा निजामाचा प्रयत्न होता. हैद्राबाद येथील या घराण्याची सत्ता इ.स. 1724 साली निजाम करण्याचा संस्थापक पहिला निजाम मीर कमरुद्दीन यांनी केली. त्यांनी 1748 पर्यंत राज्य केले. तर शेवटचा निजाम म्हणजे सातवा निजाम मीर उस्मान अली यांनी इ.स 1911 ते 1948 पर्यंत राज्य केले. हैद्राबाद संस्थानात तेलगू, कानडी व मराठी ही भाषिक जनता होती. तेलंगणा, कर्नाटक व मराठवाड्यातील एकूण 16 जिल्हे जिल्हे हे हैदराबाद संस्थानात होते. निजाम राजवटीत मराठवाड्यातील या उपप्रदेशातील औरंगाबाद, नांदेड, परभणी, उस्मानाबाद व जालना इत्यादी जिल्हे निजाम राजवटीत मोडत होते. निजामाचे सत्ता व पैसा या दोन गोष्टीवर प्रेम होते. हैद्राबाद मधील हिंदू प्रजा दडपली जाण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे त्यांच्यामधील ऐक्याचा अभाव, अशा पोषक परिस्थितीमुळे निजामाच्या शोषक व अन्यायी शासनाला संघटितरित्या विरोध जनता करू शकत नव्हती. हैद्राबाद संस्थानातील निजामाची राजवट ही शेवटी एक राजसत्ता होती. लोककल्याण हे राजसत्तेचे उद्दिष्ट नव्हते. सत्ताकांक्षा हाच राज्य सत्तेचा पाया होता. त्यामुळे लहरी कारभार, जनकल्याण रहित धोरण व सत्तेचा अनियंत्रितपणा अशी दोषपूर्ण प्रक्रिया संस्थानात होती. अनिष्ट रूढी, परंपरा, अंधश्रद्धा, अस्पृश्यता, वेठबिगारी, रोगराई, अज्ञान, निरक्षरता, स्त्री-दास्य इत्यादी निजामकालीन समाज जीवनात सर्वत्र दिसत होती. हैद्राबादच्या अन्यायकारक निजाम राजवटीच्या विरोधात अनेक सामाजिक, राजकीय, धार्मिक संघटनांनी बंड करून आपले स्वातंत्र्य मिळवण्याचा सातत्याने प्रयत्न केला. यामध्ये प्रामुख्याने महाराष्ट्र परिषद, आर्य समाज, हैद्राबाद स्टेट काँग्रेस, वंदे मातरम व महिला लढा या प्रमुख संघटनांनी निजामाला विरोध केला. हैद्राबाद मुक्तिसंग्राम लढा यशस्वी करण्यासाठी उस्मानाबाद जिल्ह्याचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. विविध संघटना व संस्थांच्या माध्यमातून रचनात्मक कार्यामध्ये सक्रिय होता. निजामाच्या अन्याकारक, जुलमी सत्तेमधून जनतेचे रक्षण करण्यासाठी आर्य समाज ही पहिली संघटना होती. स्वामी रामानंद तीर्थ यांच्या सर्वसामावेशक नेतृत्वाखाली मराठवाड्यातील विविध विचारसरणीचे अगणित स्वातंत्र्यसेनानी एकत्र आले व हैद्राबाद मुक्तिसंग्राम लढा यशस्वी केला. हैद्राबाद मुक्तिसंग्राम हे भारताच्या स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासाची सुवर्ण पान आहे. भारतीय स्वातंत्र लढाई इतकेच या लढ्याचे महत्व आहे. आणि स्वरूप ही व्यापक आहे. जर जनता आपल्या हक्कासाठी व स्वातंत्र्यासाठी एकत्रित होऊन लढली, तर यश नक्की प्राप्त होते. हे मराठवाडा मुक्ती संग्रामावरून दिसून येते. अनेक लोकांनी या अग्निकुंडात प्रवेश करून आपले योगदान या पवित्र कार्यासाठी दिले. स्वातंत्र्यसंग्रामामध्ये अनेक संघटनांनी महत्त्वाची भूमिका बजावली. आजवरच्या इतिहासामध्ये वरिष्ठ वर्गाच्या कार्यावर लेखन झालेले आहे. अठराव्या शतकापासून इतिहास विषयक रूढ धारणांना आव्हान देणारे, नवनवीन प्रवाह अवतरू लागले. या प्रवाहांनी इतिहास ज्ञान शाखेतच्या कक्षा मोठ्या प्रमाणात रुंदावल्या. इतिहास या विषय शाखेत स्थानिक इतिहास, प्रादेशिक इतिहास, पर्यावरणाचा इतिहास, खाद्य संस्कृतीचा इतिहास आणि वंचितांचा इतिहास यासारखे अनेक प्रवाह निर्माण झाले. या इतिहास लेखनाने परंपरागत व अभिजन इतिहास लेखन पद्धतीला आव्हान दिले आणि इतिहास लेखनासाठी नवीन क्षितीजे खुली केली. या इतिहास लेखन पद्धतीमुळे भारतीय इतिहासाचे नवीन विचारमंथन घडून आले. वसाहतवादी, राष्ट्रवादी, मार्क्सवादी या पारंपारिक इतिहास लेखन प्रवाहातील अभिजनवादी प्रवृत्तीला तिलांजली देऊन, वेगळ्या तत्वांचा आणि पद्धतीशास्त्राचा अवलंब करून समाजतळातून इतिहास लेखनाचा प्रयत्न या प्रवाहामध्ये झालेला आहे. अलीकडे स्थानिक इतिहास लेखनाला महत्त्व प्राप्त झाले आहे. कारण जगाच्या पाटलावर स्थानिक इतिहास लिहिला जावा असे इतिहास कराचे म्हणणे आहे. डॉ. सुमित सरकार यांनी भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील सर्वसामान्य वंचित वर्गाच्या इतिहासातील भूमिकेवर जास्त भर देऊन सर्वसामान्यांच्या सहभागाच्या कार्याचा अभ्यास केला. ब्रिटिशांनी स्वतःहून भारताला स्वातंत्र्य दिले नसून भारताचे राष्ट्रवादी लढे त्यासाठी कारणीभूत ठरले हे पुराव्यानिशी सिद्ध केले. स्थानिक इतिहास लेखनाच्या साह्याने अनेक उपेक्षित, दुर्लक्षित घटकाचा इतिहास ज्ञात होत असतो. स्थानिक इतिहास लेखन प्रवाहामुळे मानवी जीवनातील विविध पैलूंचे आकलन करणे किती आवश्यक आहे हे प्रकर्षाने जाणवते. इतिहासाच्या शास्त्रीय संशोधनासाठी हा प्रवाह पुढे आणणे गरजेचे आहे. स्थानिक गावातील लोकांच्या गौरवशाली परंपरा त्यांचे समाजासाठी, राष्ट्रासाठीचे योगदान, त्यांची संस्कृती या बाबी नक्कीच जगापुढे आणता येथील. आपली इतिहासाबाबतची दृष्टी विस्तारित करून या नवीन प्रवाहांना सामावून घेऊन त्यांना योग्य न्याय देणे आपले कर्तव्य आहे. स्थानिक इतिहास लिहिताना संशोधक ऐतिहासिक घटना व त्याच्याशी संबंधित असणाऱ्या व्यक्ती यांच्या आधारे स्थानिक इतिहास शब्दबद्ध करतो. प्रस्तुत संशोधन लेखातून हैद्राबाद मुक्तिसंग्राम लढ्यातील उस्मानाबाद तालुक्यातील रूईभर गावातील विश्वनाथ आबा कोळगे यांच्या कार्याचा अभ्यास करून, आजवर दुर्लक्षित असलेला इतिहास पुढे येऊ शकतो. यासाठी सदर संशोधन कार्य हाती घेतलेले आहे. <strong>संशोधनाची उद्दिष्टे</strong> हैद्राबाद मुक्तिसंग्राम लढ्यातील स्वातंत्र्य सेनानी विश्वनाथ आबा कोळगे यांच्या संघटन कौशल्याचा शोध घेणे. हैद्राबाद मुक्तिसंग्राम लढ्यातील विश्वनाथ आबा कोळगे यांच्या मातोश्री व रूईभर गावातील महिला स्वातंत्र्य सेनानींच्या कार्याची माहिती घेणे. गौडगाव कॅम्प मधील विश्वनाथ आबा व दादाराव भाऊ कोळगे बंधूंच्या कार्याचा शोध घेणे. करोडगिरी नाका नाईनाट व जंगल सत्याग्रहांमधील विश्वनाथ आबा यांच्या कार्याची माहिती घेणे. <strong>संशोधन पद्धती</strong> प्रस्तुत संशोधन लेखासाठी विश्लेषणात्मक संशोधन पद्धतीचा अवलंब केला आहे. याकरिता दुय्यम स्वरूपाचे तथ्य वापरलेले आहेत. संदर्भ ग्रंथ व पुस्तके वर्तमानपत्रे आणि इंटरनेटचा आधार घेतलेला आहे. <strong>विषय विश्लेषण</strong> <strong>विश्वनाथ आबा कोळगे यांचा अल्पपरिचय</strong> विश्वनाथ आबा कोळगे यांचा जन्म इ.स 1922 रोजी आपल्या स्वतःच्या रुईभर गावी सर्वसामान्य शेतकऱ्याच्या कुटुंबात झाला. आईचे नाव - सोनाबाई श्रीपती कोळगे वडिलांचे नाव - श्रीपती रामराव कोळगे पत्नीचे नाव - लिंबाबाई विश्वनाथ कोळगे विश्वनाथ आबा कोळगे यांना एक मुलगा व एक मुलगी (अनुक्रमे) सुभाषराव विश्वनाथ कोळगे नंदूबाई विश्वनाथ कोळगे हैद्राबाद मुक्तिसंग्राम लढा मराठवाड्यातील ज्या स्वातंत्र्यवीरांनी अजरामर केला. अशा अग्रगण्य स्वातंत्र्यसैनिकांमध्ये विश्वनाथ आबा कोळगे यांचे कार्य अत्यंत महत्त्वाचे होते. काळाची गरज ओळखून कार्य करणारे कर्तव्यदक्ष पुरुष होते. त्यांच्या अंगी नेतृत्व नेतृत्व गुण प्रचंड प्रमाणात होते. घरची परिस्थिती अनुकूल नसतानाही त्यांनी आपल्या ज्वलंत देशभक्तीतून हैद्राबाद मुक्तिसंग्राम लढ्यात उडी घेतली होती. आबांचा निस्वार्थीपणा, सोशिकता, सहनशीलता, बंधुता हे गुण वाखणण्यासारखे होते. व्यक्तीच्या कार्याची भव्यता तिच्या निस्वार्थीपणा व प्रतिकूल परिस्थितीत मनाचा संयम यावरच अवलंबून असते. लोकसत्ताक पद्धती आणण्यासाठी स्टेट काँग्रेस ही संघटना स्थापन झाली. आचरणाने व मनाने भगवे असलेल्या स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली या स्टेट काँग्रेसने हैद्राबाद मुक्तिसंग्राम सुरू केला. उस्मानाबाद जिल्ह्यासाठी स्टेट काँग्रेसचे ऑफिस सोलापूरला सुरू करण्यात आले. सोलापूर ऑफिसचे अध्यक्ष व उस्मानाबाद काँग्रेसचे प्रमुख कार्यकर्ते श्री.फुलचंद गांधी होते. गावागावातील काँग्रेसच्या शाखा सुरू झाल्या. प्रक्षोपक भाषण केल्याने कारण दाखवून फुलचंद गांधीवर अटक वॉरंट जारी केले. पण त्यांनी पोलिसांच्या नजरा सुकवून उस्मानाबाद जिल्ह्यात रूईभर, काजळा, उपळा, धानोरा अशा गावात गुप्तपणे प्रचार सहभाग घेऊन जनतेचे आत्मिक बल, मानसिक बल, शारीरिक बल, उंचावण्यासाठी कार्यशाळा सुरू केल्या. फुलचंद गांधी यांच्या विचार व कार्याची प्रेरणा घेऊन विश्वनाथ आबा कोळगे यांनी हैद्राबाद मुक्तिसंग्राम लढ्यात आपले कार्य सुरू केले. <strong>विश्वनाथ आबांचे संघटन कौशल्य व कार्य</strong> हैद्राबाद मुक्तिसंग्राम मुक्तीच्या प्रेरणेने विश्वनाथ आबांचा स्वातंत्र्यासाठी लढा हा उस्मानाबाद जिल्ह्यातील रूईभर सारख्या छोट्या गावातील जनतेच्या चिरंतर स्मरणात राहणारा आहे. विश्वनाथ कोळगे कमी शिकलेले होते. पण त्यांनी आपल्या 35 ते 40 अशिक्षित साथीदाराना जागृत करून त्यांच्यात देशभक्तीची ज्योत पेटवली. कोणत्याही वडिलोपार्जित संपत्तीचा संचय नसताना आबांनी मुक्तिसंग्राम अत्यंत खडतर अशा कष्टाने सुरू केला. विश्वनाथ आबांच्या संघटन कौशल्याने रुईभर गावातील नामदेव शेरखाने, दस्तगीर खोंदे, राजाराम गांधले, सोपान मुदगुडकर, भगवान पाटोळे, भगवान आगळे, जंगल आप्पा कस्पटे, माणिकराव तीर्थकर, शेखा शेरखाने, भीमा शेरखाने, काशिनाथ पडवळ, दामू काळे, खेलबा कस्पटे, गोविंदराव पवार, मारुती पडवळ, नबी तांबोळी, रामचंद्र पोतदार, मल्हारी कांबळे अशा अठरापगड जाती जमातीतील लोकांना एकत्र करून हैद्राबाद मुक्तिसंग्रामात भाग घेतला. विश्वनाथ आबांचे संघटन कौशल्य हीच मुक्ती संग्रामास बळ देणारे साधन ठरले. काँग्रेसच्या लढ्याबाबत सूचना देण्यासाठी रुईभर येथे फुलचंद गांधी यांची सभा झाली. रूईभरचे थोर सुपुत्र विश्वनाथ श्रीपती कोळगे हे स्टेट काँग्रेस शाखेचे सेनापती होते. फुलचंद गांधींच्या कार्याची प्रेरणा घेऊन आबा व त्यांच्या सहकाऱ्यांनी महत्त्वपूर्ण कार्य केले. मराठवाड्याला परदास्याच्या शृंखलातून मुक्त करण्याचे विश्वनाथ आबांचे आवाहन देशभक्तीने भारावलेल्या गावातील तरुणांच्या काळजाचा ठाव घेणारे ठरले. रूईभर गावाप्रमाणेच कित्येक गावातील जनता हैद्राबाद मुक्तिसंग्रामात तन-मनाने खंबीर उभे राहू लागली. निजामी अत्याचाराच्या विरोधात स्वातंत्रसैनिका बरोबर जनता ही प्रतीकारासाठी सज्ज झाली होती. हैद्राबाद स्वातंत्र्य संग्राम भारताच्या स्वातंत्र्यसंग्रामाला पूर्णत्व देणारा तसेच अखंडत्व व सार्वभौमत्व प्राप्त करून देणारा आहे. विश्वनाथ आबांच्या अलौकिक नेतृत्वामुळेच त्यांना त्यांचे बंधू दादाराव भाऊ कोळगे यांची खंबीर साथ मिळाली. फुलचंद गांधी यांनी दिलेल्या पत्रकातून व त्यांच्या भाषणातून हैद्राबाद मुक्ती लढ्याची रूपरेखा आबांनी नीट लक्षात घेतली. त्यातच बाबासाहेब परांजपे, मालखेरे दादा, गोविंद भाई श्रॉफ, स्वामी रामानंद तीर्थ यांच्या प्रेरणादायी नेतृत्वाने विश्वनाथ आबा कोळगे यांनी रुईभर गावात नियोजनबद्ध रीतीने लढा दिला. गावच्या मोठ्या लिंबाच्या झाडाला बांधलेल्या निजामाचा काळा ध्वज उतरवून तेथे भारताचा तिरंगा ध्वज फडकविण्यात आला. आपल्या अनेक कार्यकर्त्यांसह आबांनी स्वबळावर स्वातंत्र्याचा पहिला श्वास उपभोगला व गावातून प्रभात फेरी काढली. निजामाच्या बंदीला न जुमानता रुईभर गावात 15 ऑगस्ट 1947 हा स्वातंत्र्य दिन साजरा केला. निजामाने 145 कलमाखाली स्वातंत्र्य दिनास बंदी घातली होती. रूईभर गावातच प्रथम निजामचे 145 कलम पायदळी तुडवले गेले. विश्वनाथ आबांच्या या कृतीने तात्काळ पोलिसांची कुमुख रूईभर गावात आली व धरपकड, मारहाण सुरू करण्यात आली. कित्येक कार्यकर्ते भूमिकेत होऊन गावाबाहेर निघून गेले. काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलिसांनी विश्वनाथ आबांचा शोध सुरू केला. त्यांच्या राहत्या घरावर पोलिसांनी वाळत ठेवली. घरातील लोकांना धाक दाखवून दडपशाही सुरू केली. विश्वनाथ आबांचे हे उदात्त ध्येय होते. त्यांच्या नेतृत्वाची नियतीला ही गरज होती. आबांनी भूमीगत होऊन थेट वाघोली येथे गेले. निजामाच्या पोलिसांनी रागाने चिडून हाती असलेल्या कार्यकर्त्यांचा व आबांच्या घरच्या लोकांचा छळ करण्यास करण्याचे सत्र सुरू केले. आबांना पकडण्यासाठी निजामी पोलिसांचा प्रयत्न सफल होत नव्हता, मग पोलिसांनी कपटनीती तंत्र वापरले पोलिसांनी सारोळा, बेंबळी येथील अत्ती हातुल मुसलमान संघटनेच्या लोकांना हाताशी धरले. रजाकराच्या या कडव्या कार्यकर्त्यामार्फत पोलिसांनी आबांच्या शेतावर शस्त्र हल्ला चढविला. नंग्या तलवारी घेऊन हे आबांच्या शेतातील बैल विश्वनाथ आबांचे धाकटे बंधू दादाराव कोळगे यांच्या छातीवर तलवारी लावून बैल डोळ्यादेखत पळवून नेले. दादाराव भाऊंनी हा अन्याय उघड्या डोळ्यांनी बघितला. त्यांच्या मनाचा जळफळाट सुरू झाला. शांत, संयमी दादाराव भाऊंचा संयमाचा बांध आपोआपच फुटला. घरादार, शेतीवाडी मुले सोडून आपले थोरले बंधू विश्वनाथ आबा यांच्या वाटेने मुक्तिसंग्रामात हे सामील झाले. दादाराव भाऊं ही संग्रामात सामील झाल्याची बातमी निजामी पोलिसांना गावातील विरोधाकानी पोचवली. त्यामुळे आधीच चिडलेल्या पोलिसांनी सुडभावना आणखीनच भडकली. रुईभर गावातील कोळगे बंधूंना जेरबंद केल्याशिवाय रुईभची चळवळ थांबणार नाही. हे ओळखून पोलिसांनी संपूर्ण गावाला लष्करी छावणीचे स्वरूप आणले. रात्री अपरात्री आबांच्या व त्यांच्या साथीदारांच्या घरी पोलीस चकरा मारू लागले. कित्येक वेळा पोलिसांनी गावातील व आबांच्या घरातील स्त्रियांना धारेवर धरले. विश्वनाथ आबा यांच्या मातोश्री सोना अक्का यांचा मुलांना पाठिंबा आहे. याचा सुगावा फितूरकरवी पोलिसांनी घेतला. पोलिसांनी माता-भगिनी या मानवतावादी नात्याचा विचार न करता त्रास दिला. <strong>विश्वनाथ आबा कोळगे यांच्या मातोश्री सोना </strong><strong>अक्का व महिलांचे मुक्तिसंग्रामातील अप्रत्यक्ष सहभाग</strong> हैद्राबाद मुक्ती संग्रामात उस्मानाबाद जिल्ह्यातील महिला स्वातंत्र्य सेनानीचे कार्य दोन प्रकारचे होते. काही स्वातंत्र्यसेनानी महिलांनी आपल्या पतीच्या, मुलाच्या कार्यात प्रत्यक्ष सहभाग घेतला. तर काही महिलांनी भूमिगत राहून आपला सहभाग नोंदवला. स्टेट काँग्रेस व आर्य समाजाच्या कार्यात संसाराची परवा न करता स्वतःला समाविष्ट करून घेतले. घरातील दारिद्र्याला समोर जात या स्त्रियांनी मुक्ती लढ्यात ही तेवढ्याच प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहभाग घेऊन हैद्राबाद स्वातंत्र्यासाठी आपले योगदान दिले. आम्ही देशासाठी करू बलिदान या दिशेने आपापली कामे महिलांनी केल्याचे दिसून येते. जगातील प्रत्येक क्रांती ही स्त्रियांच्या सहभागाशिवाय किंवा पाठबळाशिवाय यशस्वी होत नसते. विश्वनाथ आबा व दादाराव भाऊ कोळगे या चिमण्यांचे पित्रछत्र काळाने अकाली हिरावून घेतलेले असतानाही रुईभरच्या विश्वनाथ आबा, दादाराव भाऊ दोन देशभक्त सेनानीची माता या संग्रामात अप्रत्यक्ष सहभागी झालेल्या होत्या. ही घटना रुईभर गावाच्या महिलांच्या इतिहासातील सन्मानाची ठरते. सोना अक्काला आपल्या देशभक्त मुलांचा अभिमान होता. निजामी पोलिसांचा ससेमिरा पाठीमागे असतानाही आपल्या मुलांना नव्हे तर भारत मातेच्या सुपुत्रांना अन्न पाणी पुरवण्यासाठी सोना अक्का रजाकारी मुसलमान यांच्या नजरा चुकून कधी स्वतः तर कधी कार्यकर्त्यामार्फत मायेचा घास पोचवत असत. घराच्या संगोपनाची जबाबदारी त्या धिरोदत पुरुषाप्रमाणे पार पाडीत. देशभक्त मातेने आपल्या मुलाच्या ध्येयपूर्तीसाठी प्रेरणा दिली. रजाकाराने दहशत निर्माण करण्यासाठी अक्कासह घरातील सर्व कुटुंबियांना विहिरीत ढकलण्याचा डाव रचला, पण गावातील सतप्रवर्त लोकांनी वार्ता कार्यकर्त्यामार्फत विश्वनाथ आबा व दादाराव भाऊ यांना पोहोचवल्यामुळे दादाराव भाऊनी सोना अक्काला वाघोली येथे पोहोचविले. रूईभर गावातील सोना अक्का व इतर महिलांनी स्वातंत्र्य सैनिकांना त अन्न पुरवणे व शस्त्रास्त्रं पुरविण्याचे कार्य केले. तसेच स्वातंत्र्यसैनिकांना त्यांच्या कार्यासाठी प्रोत्साहित केले. महिला स्वातंत्र्य सेनानीने राष्ट्रीय कार्यात शक्य ते सर्व सहकार्य करून आपले योगदान दिले. सोना आका यांच्या या राष्ट्रीय कार्यात गावातील लिंबाबाई कोळगे, गंगाबाई कोळगे, अनुसया पवार, मालनबाई तीर्थकर अशा स्वातंत्र्य सेनानी महिलांनी मोलाचे सहकार्य केले. हैद्राबाद मुक्तिसंग्राम लढ्यातील रुईभर गावातील महिला स्वातंत्र्यसेनानीचे कार्याचे मोल काढणे शक्य नाही. हैद्राबाद मुक्तिसंग्राम लढ्यात रूईभर गावातील अनेक महिलांनी आपले जीवन समर्पित केले. <strong>गौडगाव कॅम्प मधील विश्वनाथ आबांचे कार्य</strong> थोर पुरुषांची चरित्रे त्यांच्या आयुष्याच्या लांबीवर नव्हे, तर तत्कालीन प्रतिकूल परिस्थितीत केलेल्या कार्यातून स्पष्ट होत असतात. निजाम सरकार प्रत्येक शेतकऱ्याकडून सक्तीने लेव्ही (कर) गोळा करीत असे. हे धान्य सरकारी वखारी जमा होई. गरीब शेतकऱ्यावरील अन्याय दूर करण्यासाठी गौडगाव कॅम्पच्या राजाभाऊ जाधव यांनी लेव्ही(कर) देण्यास नकार दिला. राजाभाऊच्या या कृतीचे संपूर्ण चिलवडी गावाचने अनुकरण केले. त्याचाच सुड म्हणून निजामाने संपूर्ण चिलवडी गाव अमानुषपणे जाळले. कॅम्पसैनिकांनी उस्मानाबाद जिल्ह्यात स्वतंत्र्यास आर्थिक बळ उपलब्ध व्हावे, निजामी सरकारची आर्थिक नाडी बंद पडावी व जनतेची व शेतमजुराची लूट थांबावी या उद्देशाने जिल्ह्यात लेव्ही लुटण्यास सुरुवात केली. रूईभरच्या स्वतंत्र सैनिकांनी विश्वनाथ आबा यांच्या नेतृत्वाखाली सारोळा गावात जमा झालेला, 35 गाड्यातील लेव्ही माल ताब्यात घेतला व वाघोली कॅम्पवर पोचवला. वडगावला सारा कर गोळा करून घेऊन जाणाऱ्या निजामी अधिकाऱ्याला विश्वनाथ आबा व दादाराव भाऊ कोळगे यांनी आडवा केला. रात्री बारा वाजता साऱ्याची रक्कम घेऊन जाताना विरोध करणाऱ्या वडगावच्या पोलीस पाटलाला वेशीत उलटा टांगले. कॅम्पच्या माध्यमातून निजामी सरकारला प्रतिकार करण्याचे कार्य विश्वनाथ आबांनी केल्यामुळेच सामान्य लोकांची निरामाबद्दलची भिती हळूहळू कमी होऊन,जनता ही स्वातंत्र्य लढ्यात मदत करू लागली‌. कॅम्पद्वारे दादाराव भाऊ यांनी गुप्तहेरचे काम केले. दादाराव भाऊनी संपूर्ण वेश बदलून रजाकारी छावणीत गुप्त हेराचे काम केले. गुप्तहेर दादाराव भाऊंनी सगळी बातमी गौडगाव कॅम्पला दिली व हल्ल्याची तयारी केली. एका रात्रीत हातात फक्त गावठी हात बॉम्ब घेऊन रजाकरी छावणीवर स्वातंत्र्यसैनिक तुटून पडले. कॅम्पसैनिकांनी दहा-बारा रजाकराचा जागीच खात्मा केला. दादाराव भाऊंच्या जीव घेण्या गुप्तहेरीने मानेगावच्या रजाकारी छावणीवर यशस्वी ताबा मिळवला. <strong>करोडगिरी नाका व जंगल सत्याग्रहातील विश्वनाथ आबा कोळगे यांचे कार्य</strong> संस्थानातील शेतकऱ्यांनी आपला शेतमाल पर प्रांतात चोरून विकू नये व परप्रांतातील माल खरेदी करू नये यासाठी सीमावर्ती भागात निजामाने करोडगिरी नाके बसवले होते. जनतेला अशा नाकेदाराकडून खूप त्रास होत होता .उन्नत नाकेदार व सैनिक जनतेला त्रास देत होते. सामान्य जनतेला शेतकऱ्यांना या त्रासातून मुक्त करण्यासाठी नाका नाईनाट सत्र सुरू केले. गौडगाव कॅम्प मध्ये असताना विश्वनाथ आबा यांच्या नेतृत्वाखाली सारोळा येथील नाका लुटून जाळण्यात आला. रौळगाव, सुर्डी, कात्री येथील चौक्या जाळण्यात आल्या. नाकेदार निजाम मारले गेले. सत्याग्रह, असहकार आंदोलन यांचा निजाम राजवटीवर फारसा परिणाम होत नव्हता म्हणून जंगल सत्याग्रह करण्याच्या सूचना ऑफिस द्वारे कॅम्पला देण्यात आली. विश्वनाथ आबा व दादाराव भाऊ कोळगे यांनी निजाम सरकारची आर्थिक उत्पन्न असणारी शिंदी झाडांना आगी लावल्या. संपूर्ण उस्मानाबाद जिल्ह्यात 1500 शिंदी व ताडीची झाडे तोडण्यात आली. निजाम सरकारने दडपशाहिचे सत्र सुरू केले. गावोगाव रजाकार पाठवून जाळपोळ, अत्याचार केले. विश्वनाथ आबांनी आजमोदीन रजाकाला रुईभर गावच्या वेशिला बांधले व रायफलीच्या एकाच गोळीत त्याला यमसदनी पाठवले. विश्वनाथ आबा सारख्या स्वातंत्र्यसेनानी चे कार्य हैद्राबाद मुक्तिसंग्राम लढ्यात जनतेच्या चिरंतर स्मरणात राहणारे आहे. <strong>सारांश</strong> हैद्राबाद स्वातंत्र्यसंग्राम भारताच्या स्वातंत्र्यसंग्रामाला पूर्णत्व देणारा ठरला. भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील या लढ्याचे महत्त्व आहे. जर जनता आपल्या हक्कासाठी व स्वातंत्र्यासाठी एकत्रित येऊन लढली तर यश नक्की प्राप्त होते हे मराठवाडा मुक्तीसंग्राम दिसून येते. हैदराबाद मुक्तिसंग्राम लढा यशस्वी करण्यासाठी उस्मानाबाद जिल्ह्याचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. हैद्राबाद मुक्तिसंग्राम मराठवाड्यातील ज्या स्वातंत्र्य आणि अजरामर केला अशा अग्रक्रमाने स्वातंत्र्य सैनिकांमध्ये रुईभरचे विश्वनाथ आबा कोळगे यांचे कार्य मोलाचे होते. काळाची गरज ओळखून कार्य करणारे कर्तव्यदक्ष पुरुष आबा होते. त्यांच्या अंगी नेतृत्व प्रचंड प्रमाणात होते. विश्वनाथ आबांनी आपल्या संघटन कौशल्याने रुईभर गावातील अठरापगड जाती जमातीतील युवकांना आपल्या राष्ट्रीय कार्यात सहभागी करून घेतले. विश्वनाथ आबांनी रुईभर गावात नियोजन बद्ध रीतीने भूमिगत राहून मुक्तिसंग्रामात योगदान दिले. विश्वनाथ आबांच्या कार्यात त्यांचे बंधू दादाराव भाऊ कोळगे यांनी आपले जीवन समर्पित केले. कोळगे बंधूंच्या मातोश्री सोना आका यांनी भूमिगत राहून महत्त्वाचे कार्य केले. जगातील प्रत्येक क्रांती ही स्त्रियांच्या सहभागाशिवाय यशस्वी होत नसते, हे आपल्या कार्यातून सोना अक्का व रुईभर गावातील महिलांच्या कार्यातून समोर येते. तसेच स्वातंत्र स्वातंत्र्यसैनिकांना त्यांच्या कार्यासाठी प्रोत्साहित करून राष्ट्रीय कार्यास शक्यते सर्व सहकार्य केले. गौडगाव कॅम्पच्या माध्यमातून कर म्हणून लेव्ही करामधुन शेतकऱ्यावरील अन्या दूर करण्यासाठी निजामाने गोळा केलेला 35 गाड्यातील माल ताब्यात घेऊन वाघोली कॅम्पवर पोहोचवला. गौडगाव कॅम्पच्या माध्यमातून निजाम सरकारला प्रतिकार करण्याचे कार्य विश्वनाथ आबांनी केल्यामुळे सामान्य लोकांची निजमाबद्दलची भीती हळूहळू कमी होऊन, जनता ही स्वातंत्र्यलढ्यात मदत करू लागली. त्यांच्या माध्यमातून निजामी सत्तेचे लचके तोडणारी संताजी व धनाजी म्हणजे रुईभर गावचे विश्वनाथ आबा व दादाराव भाऊ कोळगे असे म्हणावे लागेल. करोडगिरी नाका नाईनाट सत्रातून सामान्य जनता व शेतकऱ्यांना विश्वनाथ आबांनी मुक्त करण्याच कार्य केले. निजाम सरकारच्या आर्थिक उत्पन्न असणारी शिंदी व ताडीची झाडांना आगी लावून निजामास जेरीस आणले. एका सामान्य कुटुंबात जन्मलेल्या विश्वनाथ बाबा कोळगे व गावातील सर्वसामान्य कष्टकरी जनतेने दिलेल्या योगदानामुळे हा स्वातंत्र्यसंग्राम यशस्वी झाला. विश्वनाथ आबा सारख्या स्वातंत्र्य सेनानीचे कार्य हैद्राबाद मुक्तिसंग्राम लढा जनतेस चिरंतर स्मरणात राहणार आहे. <strong>निष्कर्ष</strong> स्वातंत्र्यसेनानी विश्वनाथ आबा कोळगे यांनी आपल्या अलौकिक संघटन कौशल्याने हैद्राबाद मुक्तिसंग्राम लढ्यात महत्वपूर्ण कार्य केले. हैद्राबाद मुक्तिसंग्राम लढ्यात विश्वनाथ आबा कोळगे व त्यांच्या मातोश्री व इतर महिला स्वातंत्र्य सेनानीने अप्रत्यक्ष कार्य केले. हैद्राबाद मुक्तिसंग्राम लढ्यातील गौडगाव कॅम्पच्या माध्यमातून विश्वनाथ आबा व दादारावभाऊ कोळगे यांनी महत्त्वाचे योगदान दिले. करोडगिरी नाका नायनाट व जंगल सत्याग्रहात विश्वनाथ आबांचे कार्य स्मरणीय आहे. <strong>संदर्भग्रंथ सूची</strong> वैभवशाली मराठवाडा ­­- विशेष अंक - 2019 प्र. क्र. 25, 29, 39 31 वे मराठवाडा साहित्य संमेलन मुरुड – फेब्रुवारी 2020 पृ. क्र. 28 इतिहास संशोधन पत्रिका मराठवाडा इतिहास परिषद औरंगाबाद प्र. क्र. 61, 109 हैद्राबाद स्वातंत्र्यसंग्राम - वसंत पोतदार आष्टा (का) लातूर जिल्हा गॅझेटिअर, भाग 01, दर्शनीका विभाग, महाराष्ट्र शासन मुंबई, सप्टेंबर 2022 प्रा. सतीश कदम - हैद्राबाद मुक्तिसंग्रामात असे झुजंलो आम्ही कैलास पब्लिकेशन, औरंगाबाद वसंत पोतदार - हैद्राबाद स्वातंत्र्य संग्राम विद्याभारती प्रकाशन लातूर, 2006 विवेक भोसले - क्रांतिवीर दत्तोबा भोसले (मातोळीकर) स्पॅन पब्लिकेशन, औरंगाबाद हैद्राबाद मुक्तिसंग्राम लढ्यातील सामाजिक व सांस्कृतिक चळवळीत महिलांचा सहभाग डॉ. सुभदा धारूरकर